पुणे : शहरातील येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, शासकीय निवासस्थानात ‘चर्च’ चालवल्याच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आशियातील सर्वांत मोठ्या मनोरुग्णालयांपैकी एक असलेल्या या रुग्णालयातील उपअधीक्षकांसाठी राखीव असलेल्या निवासस्थानी धार्मिक उपक्रम सुरू असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शासकीय निवासस्थानात दर रविवारी प्रार्थना सभा घेतल्या जात असून, त्याचे स्वरूप ‘चर्च’प्रमाणे असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी काही व्हिडीओ फुटेज समोर आल्याने या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी परिसरात राहत नसल्याचा फायदा घेऊन हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करताना सांगितले की, येथे येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना लक्ष्य केले जात आहे. “रुग्ण बरा करून देऊ, मुलांचे शिक्षण पूर्ण करू किंवा नोकरी मिळवून देऊ,” अशी आमिषे दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णांच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात असल्याची टीका देखील होत आहे.
या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक उपक्रम सुरू असताना अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर प्रशासनाच्या मूकसंमतीनेच हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईचा इशारा दिला आहे. संबंधित ठिकाणी प्रार्थनास्थळ चालवले जात असल्याची माहिती पूर्वीच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जर नियमांचे उल्लंघन आढळले, तर संबंधित कर्मचाऱ्याला ‘शो-कॉज’ नोटीस देऊन निवासस्थान रिकामे करून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर आरोग्य विभागातही खळबळ उडाली असून, शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शासकीय मालमत्तेचा धार्मिक कारणांसाठी वापर करणे कितपत योग्य आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
येरवडा मनोरुग्णालयात यापूर्वीही विविध गैरप्रकार आणि प्रशासनातील त्रुटींबाबत आरोप झाले होते. अशा पार्श्वभूमीवर हे नवे प्रकरण समोर आल्याने रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात सरकार आणि आरोग्य विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






